थोडा है थोडे की जरुरत है @ 16.01.24
नवे मायबाप..(भाग २)
मी म्हणालो.. तुम्ही दोघांनी ही समस्या सर्वप्रथम समजावून घ्यायला हवी. त्याआधी ही समस्या आहे हे लक्षात घ्यायला हवे. ज्याप्रमाणे शरीराचे छोटे छोटे आजार असतात व त्या आजारांकरीता सुरुवातीला आपण घरघुती इलाज करतो. या घरघुती औषधांनी जर सुधारणा झाली नाही तर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो. परंतू याच्या उलट आपल्या वागण्याच्या किंवा मनाच्या काही समस्या असतील तर त्याच्याकडे आपण संपुर्ण दुर्लक्ष करतो. दुर्दैवाने हे मनाचे छोटे छोटे आजार मोठे होतात व त्यामुळे व्यक्तिमत्वामधे कायमस्वरुपी दोष राहून जातो. आपल्या सामाजिक चौकटीमधे अजूनही मनाच्या आजारांना हवे त्या पद्धतीने समजून घेणे व ते दुरुस्त करणे सुरुच झालेले नाही.
तुमच्या मुलाच्या मनामधे जो राग उत्पन्न होतो व त्याचे ज्या पद्धतीने त्या दिवशी प्रगटीकरण त्याने केले यामधे तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का? हा अनुभव मला तुमच्याकडेच नाही तर सध्या अनेक ठिकाणी येतोय. राग आला म्हणून टीव्हीचा रीमोट सहा वर्षाच्या मुलाने फोडून टाकला, दूधात आईने साखर घातली नाही म्हणून ग्लासभर दूध फेकून दिले, वर्गात मित्राने खोड काढली तर त्याला जोराने काहीतरी फेकून मारले, राग आला म्हणून घरच्या कुत्र्याला किंवा मांजरीला बेदम मारले हे असले प्रकार लहान मुलांमधे वाढताना दिसत आहेत. पण तुमच्याच प्रमाणे त्या मुला मुलींचे पालक देखील या वागण्याकडे अत्यंत सहजतेने दुर्लक्ष करून, आमच्या मुलाचा रागच कंट्रोल होत नाही असे बोलून मोकळे होतात. हा अनिर्बंध राग पुढे जाऊन त्या मुलाच्या किंवा मुलीच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतो व त्यामुळे सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला रीलेशन एस्टॅब्लीशमेंटमधे म्हणजेच नाती निर्माण करण्यामधे व जपण्यामधे मोठी समस्या उद्भवते. त्यातून तो एकटा पडतो व अंतीमतः वैफल्यग्रस्त झाल्यावर पूर्णपणे मानसिक रुग्ण होतो. शरीराच्या आजाराचे जसे आहे तसेच मनाच्या आजारांचे आहे. आपल्याला सर्दी खोकला झाला तर प्राथमिक पातळीवरच त्यावर उपचार केले तर व्याधी पटकन बरी होते. परंतू त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर मग साधी सर्दी देखील फुप्फुसाच्या विकारामधे परावर्तीत होते व कधी कधी जिवघेणी ठरते. मी हे सारे सांगितल्यावर ते दोघे जरा गंभीर झाले. प्रश्न मात्र त्यांनी नेहेमीचाच विचारला, मग आता काय उठसुठ पोराला मारठोक करायची का? कदाचित तेच करावे लागेल. जसे जुन्या काळात मायबाप करायचे तेच उपयोगी पडेल का? मी त्यांना म्हणालो, काहीतरी काय बोलताय? उद्या तुमच्या मुलाला ताप आला तर त्याला मारझोड कराल का? की त्याला दवाखान्यात न्याल? मुळात हा विषय तुम्ही समजून घ्या. समजून घेण्याची मानसिकता बनवा.
तुमच्या मुलाला मनाचा छोटासा आजार झाला आहे. त्याला आपल्याला बरे करायचे आहे. यासाठी एखाद्या समुपदेशकाकडे त्याला व तुम्हाला जाण्याची गरज आहे. मुलांमधे विशेषतः लहानपणी प्रचंड उर्जा असते व त्या उर्जेचा अतिरीक्त संचय त्यांच्याकडे राहतो. त्या उर्जेचा विनीयोग योग्य पद्धतीने केला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य नियोजन जर आपण केले तर त्या मुलाच्या अंगी तयार होणारा हा आक्रस्ताळेपणा कमी करता येतो. याकरीता काही छोट्या छोट्या गोष्टी पालक म्हणून आपल्याला कराव्या लागतील. त्यामधे मारणे किंवा रागावणे अजिबात नाही तर त्याच्याशी काही विशिष्ट ॲक्टीव्हीटीच्या माध्यमातून मैत्री करणे, त्या ॲक्टीव्हीटी करीता आई व बाबा दोघांनीही वेळ देणे व हळू हळू त्याच्या मनाचा हा, अनियंत्रित रागाचा छोटासा आजार, बरा करणे या बाबी असतात. त्याला देखील काही टास्क दिले जातात व त्याची हसत खेळत पूर्तता करून घ्यावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही दुर्लक्ष केलेला हा छोटासा मनाचा आजार मोठ्या आजारामधे परावर्तित होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. माझे हे सारे ऐकल्यावर त्या मुलाच्या आईने डोळ्यातून अश्रुधारा काढून आमच्याच नशिबी असे का यावे वगैरे बोलणे सुरु केले. मी त्यांना परत थांबविले. त्यांना मी निक्षून सांगितले की तुमच्या मुलाच्या बाबतीत जे झालेय त्याबद्दल त्याला दोष देऊ नका कारण यामधे जास्त टक्के दोष तुमचा आहे. त्यामुळे आता दोषारोपण करण्यापेक्षा याबाबत सुधारणा करणे गरजेचे आहे. नव्या युगाचे नवे मायबाप बनण्याची गरज आहे. ही घटना घडून साधारण पाच महिने उलटले आहेत. सुदैवाने त्या मुलाच्या वागण्यात लक्षणीय सुधारणा असल्याचे त्याच्या आई बाबांनी अत्यंत आनंदाने कळविले आहे.
नव्या युगात आपल्या सर्वाच गोष्टींचे स्वरुप बदलतेय तसे आपल्या घराचेही बदलतेय. त्यामुळे घरातील नव्या समस्यांना नव्या पद्धतीने बघणे आवश्यक आहे. त्यामधे सुधार करण्याकरीता जुन्या काळातील हातखंडे उपयोगाचे नाही. आता हे सारे नाविन्यपूर्णतेने सोडवावे लागेल व त्यासाठी हे बदल स्विकारण्याकरीता मनाची तयारी असलेले नवे माय-बाप बनावे लागेल… होय ना?
अगदी खरे आहे. प्रत्येक पिढी स्वतः ची पिढी किती great होती या आविर्भावात फिरत असते आणि नवीन पिढीला सतत टोमणे मारत असते. पिढी दर पिढी होणारे बदल त्यांच्या पचनी पडत नाहीत. फार कमी पालक आहेत जे हे बदल स्वखुशीने स्वीकारतात आणि कालाय तस्मै नमः म्हणून पुढे जातात. आताच्या मुलांची lifestyle खूपच वेगळी आहे. मैदानी खेळ खेळा किंवा घराबाहेर खेळा असे म्हणणे तितकेसे सोपे राहिले नाही... हा सुद्धा एक विषय आहे ज्यावर चर्चा व्हायला हवी आहे.
ReplyDelete