Article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
सामर्थ्य या संवादास दे... दोन पिढ्यांमधील संवाद हे कधी सुसंवाद तर कधी विसंवाद असतात. हा नियम कोणत्याही ठराविक पिढ्यांच्या जोडीला लागू पडतो असे नाही. प्रत्येकच दोन पिढ्यांमधे हा प्रकार आढळतो. फरक पडतो तो केवळ विषयांचा, गरजांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा. बाकी विचारांचे वेगळेपण हे स्वाभाविकपणे राहतेच. असाच एका बाप व लेकी मधला पत्ररुपी संवाद मला वाचायला मिळाला. हे दोन्हीही संवाद एकमेकांना दिलेली उत्तरे नाहीत तर स्वतंत्र मते आहेत. मी या पत्रांचा वाचक म्हणून या दोन्हीही मतांच्या मधे उभा राहून माझे मत तपासून घेतोय. लेकीचा पत्ररुपी संवाद: बाबा, तुम्ही मला जरा समजून घ्यावे असे मला वाटते. मी आत मोठी झालेय हे प्रथम तुम्ही तुमच्या मनाला पटवायला हवे. मी आता अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाबा मला सोळावं वर्ष लागलंय. आता मला काही निर्णय माझ्या मनाने घेऊ द्या ना. मला ठाऊक आहे की तुम्हाला माझी फार काळजी वाटते आणि मला हे देखील ठाऊक आहे की ही काळजी तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच निर्माण होत असते. पण बाबा, मला आता तुमचे काळजी करणे बंधन वाटायला लागले आहे. मला तुम्ही मोबाईल फोन देणार नाही असे सा